
एकल महिलांच्या मुलांना शालेय साहित्य वाटप; सामाजिक संस्थांचा सहभाग उल्लेखनीय
अहमदनगर | प्रतिनिधी
Ahmednagar: येथील जगदंब फाउंडेशन हे वंचित, गरजू आणि उपेक्षित घटकांसाठी सातत्याने कार्य करत आले आहे. नुकत्याच एका उपक्रमांतर्गत संस्थेने एकल महिलांच्या मुलांना दर्जेदार शालेय साहित्य वाटप केले. या उपक्रमात शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य देण्यात आले.
शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम जगदंब फाउंडेशनच्या पाईपलाईन रोड, भिस्तबाग चौक येथील कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि कोहिनूर मंगल कार्यालयाचे संचालक राजेंद्र उदागे पाटील यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “एकल महिलांच्या कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी जगदंब फाउंडेशन आणि साऊ एकल महिला समितीची भूमिका अत्यंत मोलाची आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश लंघे होते. सचिव अशोक कुटे, जयश्री कुटे, विनोद ढोरजकर, अमोल निंबाळकर, प्रभू कर्डिले, बंडू आहेर यांच्यासह जिजाऊ महिला ग्रुप, छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, समाजातील इतर घटकांनीही स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. भाजपा सावेडी मंडळ अध्यक्ष राजेंद्र काळे व मनीषा बारस्कर-काळे यांनी २५ मुलांना शालेय साहित्य दिले. अशोक कुटे यांच्या आवाहनानंतर उद्योजक किरण काळे आणि प्रसाद कुलकर्णी यांनी पुढील ३५ विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी सरांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान संपूर्ण नगर जिल्हा आणि राज्यभरात राबवले जात असल्याचे अशोक कुटे यांनी सांगितले.
“एकल महिलांच्या मुलांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे दात्यांनी पुढे येऊन या मुलांना शिक्षणासाठी मदत केली, तर त्यांच्या आयुष्याला दिशा मिळेल व नव्या आशा निर्माण होतील.”
— राजेंद्र उदागे
मदतीसाठी संपर्क:
अशोक कुटे, जगदंब फाउंडेशन
📞 7447785910